Saturday, 13 October 2018

कारवाँ : आयुष्यातील हलक्या फुलक्या क्षणांवर प्रेम करणाऱ्यांसाठी


कारवाँ : आयुष्यातील हलक्या फुलक्या क्षणांवर प्रेम करणाऱ्यांसाठी


वडील आणि मुलाचं नातं थोडंसं गुंतागुंतीचं किंवा कॉम्प्लेक्स असतं. लहानपणी नाईलाजानेच वडिलांच्या आज्ञेत असलेला मुलगा मोठा झाल्यावर मात्र बंड करून उठतो. वडिलांचे विचार त्याला जुने वाटू लागतात. इकडे वडिलांना देखील मुलाचे विचार पटत नाहीत. आयुष्यातील खाचखळग्यांना कष्टाने पार करत आलेल्या वडिलांना मुलाने आपण सांगितलेल्या वाटेने जावे असे वाटत असते. मुलाला मात्र त्याच्या आवडीच्या मार्गाने जायचे असते. खरे तर दोघांच्याही भूमिका  आपआपल्या ठिकाणी योग्यच असतात, पण संवादाच्या अभावामुळे दोघात अंतर पडत जातं.  दोघेही एकमेकांशी अगदी तुटकपणे वागू लागतात. कधी कधी आयुष्याच्या अगदी शेवटपर्यंत...

वडिलांशी असंच काहीसं गुंतागुंतीचं नातं असलेल्या अविनाशला (दूलकर सलमान) फोटोग्राफीत करियर करायचं असतं. पण वडिलांच्या हट्टाखातर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग चे शिक्षण घेऊन बेंगलोर मधील एका आय. टी. कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या अविनाशला आयुष्य म्हणजे एक सजा वाटत असते. आपली स्वप्नं वडिलांनी उध्वस्त केली याचा राग मनात ठेऊन त्याने आपल्या वडिलांशी नातं पूर्णपणे तोडलेलं असतं. आवडणाऱ्या विषयातील रुक्ष नोकरी करताना कंटाळलेल्या आणि आतल्या आत कुढणाऱ्या अविनाशला एके दिवशी गंगोत्रीच्या यात्रेला गेलेल्या आपल्या वडिलांचे प्रवासादरम्यान अपघाती निधन झाल्याचा फोन येतो. वडिलांचा मृतदेह असलेली शवपेटी (कॉफीन) अविनाश ने कुरियर कंपनीतून घेऊन जावी असेही त्याला कळवण्यात येते. वडिलांच्या प्रति फारशी आत्मियता नसलेल्या अविनाशला या बातमी मुळे फारसा धक्का वगैरे काही बसत नाही. नाईलाजाने आणि कर्तव्य भावनेने अविनाश वडिलांच्या मृतदेहाला कुरियर कंपनीतून ताब्यात घेतो.


वडिलांच्या प्रति मुळीच प्रेम वाटत नसलेला अविनाश वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतो खरा पण कॉफीन उघडताच आपल्या  जिवलग मित्राच्या शौकत च्या (इरफान खान) च्या मदतीने दहनासाठी स्मशानभूमीत घेऊन जातो. स्मशानभूमीत त्याच्या लक्षात येते की शवपेटीत चुकून एका भलत्याच स्त्री चा मृतदेह आलेला असतो. कुरियर कंपनीत चौकशी केल्यावर त्याला कळते की प्रेतांची अदलाबदल झालेली असते. कुरियर कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अविनाशच्या वडिलांचा मृतदेह भलतीकडेच म्हणजे कोची मध्ये पाठवला गेलेला असतो. चुकून अदलाबदली झालेल्या स्त्रीचा मृतदेह कोची मधील तिच्या कुटुंबीयांकडे पोहोचता करून त्यांच्याकडील आपल्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अविनाश आणि शौकत कोचीच्या प्रवासाला निघतो.

बेंगलोर ते कोची हा प्रवास शौकतच्या व्हॅन मधून सुरु होतो. प्रवासात अनेक गमती जमती घडतात. शौकत च्या व्हॅन वर लिहिलेले असते 'मै अकेलेही चला था जानिब--मंजिल मगर, लॉग जुडते गये और कारवाँ बनत गया' आणि घडते ही असेच. योगायोगाने अविनाशच्या बरोबर असलेली मृत स्त्रीची नात तान्या (मिथिला पालकर) या काराव्यात सामील होते. या प्रवासात तीन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिरेखांना नशीब एकत्र आणतं. या प्रवासाच्या प्रत्येक वळणावर येणारे अनुभव या तिघांना शहाणपण शिकवून जातात. या प्रवासात घडणाऱ्या गमती प्रत्यक्ष चित्रपट पाहूनच अनुभव्या अशा आहेत.


या हलक्याफुलक्या, काहीशी विनोदी झालर असलेलया चित्रपटात लक्षात राहतो तो शौकत म्हणजे अर्थातच इरफान खान, आणि त्याचा सहजसुंदर अभिनय. हा शौकत स्वच्छंदी जगणारा, प्रत्येक गोष्टीकडे प्रॅक्टिकली बघणारा असा आहे. हा चित्रपट म्हणजे 'सबकुछ इरफान खान' असेच म्हणावे लागेल. इरफान खान ने साकारलेले शौकत चे पात्र या चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरते. काहीसा स्पष्टवक्ता, पण प्रेमळ, सज्जन अशा आपल्या व्यक्तिरेखेचे पैलू इरफान ने विनोदी, मिस्कील पद्धतीने सादर केले आहेत. मल्याळम चित्रपट सृष्टीमधील सुपरहिट कलाकार 'दूलकर सलमान' याने या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केलय, ते ही यशस्वीपणे ! तान्या च्या भूमिकेतली मिथिला पालकर तिच्या अल्लड भूमिकेमुळे आणि सुंदर दिसण्यामुळे लक्षात राहते

  सुरवातीला हा चित्रपट थोडा संथ वाटतो खरा, पण जशी कथा पुढे सरकत जाते तशी ही पात्रे आपलीशी वाटू लागतात. या कथेत काही अशक्यप्राय वास्तवाशी संबंध नसलेली वळणे येतात, पण दिग्दर्शक 'आकर्ष खुराना' यांनी केलेल्या चित्रपटाच्या आकर्षक आणि सहजसुंदर मांडणी मुळे चित्रपटातील त्रुटींकडे फारसे लक्ष जात नाही. या प्रवासात तीनही व्यक्तिरेखा 'स्व' त्वाच्या शोधात स्वतः मध्ये हरवून गेलेल्या असतात. आपणही आपल्या आयुष्याच्या प्रवासात स्वतः ला शोधण्याचा प्रयत्न करत असतो नाही का?

राजीव जतकर.

टीप: हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ वर उपलब्ध आहे.  


No comments:

Post a Comment