Monday, 30 April 2018

'न्यूड' - तथाकथित संस्कृती रक्षकांना सणसणीत चपराक.


'न्यूड' - तथाकथित संस्कृती रक्षकांना सणसणीत चपराक.


खूप कष्टपूर्वक बनवलेल्या सिनेकलाकृतींवर तथाकथित आणि स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी हल्ला करून चित्रपटांचे प्रदर्शन बंद पडण्याच्या अनेक घटना नजीकच्या काळात होऊन गेल्या. पारंपरिक विचारसरणीतून बाहेर पडून कलाकार, मग तो कोणत्याही कलाक्षेत्रातील असो, आपल्या संवेदनशील नजरेतून कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. कला ही जात, धर्म, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत वगैरे बंधनात कधीच अडकून पडत नाही. अशाच विचारांच्या काहीश्या पार्श्वभूमीवर 'न्यूड' हा चित्रपट बेतलेला आहे. नग्नता हा विषय असून देखील चित्रपटात भिभत्सपणा कोठेही जाणवू देता निर्माता दिग्दर्शक रवी जाधव यांनी हा चित्रपट सिनेरसिकांसाठी सादर केलाय. हा चित्रपट कोठेही सेक्सी किंवा बोल्ड वाटता, प्रेक्षकांना तो नग्नतेकडे कलात्मक दृष्टीने बघायला शिकवतो.


चित्रपटाची कथा तशी साधीच आहे. एका खेडेगावातली यमुना (कल्याणी मुळे) आपल्या पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे आणि तो तिला करत असलेल्या मारहाणीमुळे कंटाळलेली असते. एकदा हे सर्व असह्य झाल्यामुळे आपल्या मुलाला लक्ष्मणला (मदन देवधर) घेऊन मुंबईला आपल्या मावशी चंद्राक्का कडे (छाया कदम) येतेयमुना मावशी कडे राहायला आल्यावर मुंबईत काम शोधायला लागते. तथापि तिला काम काही मिळत नाही. मावशीला एकदा ती विचारते कीती कुठे काम करते’? मावशी उत्तर देताना काहीशी अडखळते. 'मावशी कुठे आणि कसले काम करते'? या उत्सुकतेपोटी यमुना चंद्राक्का मावशीचा हळूच पाठलाग करत सर जे.जे कला महाविद्यालयात पोहोचते. या महाविद्यालयात चंद्राक्का शिपायाचे काम करता करता न्यूड मॉडेल म्हणूनही काम करत असते. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर चंद्राक्काला नग्नावस्थेत मॉडेल म्हणून बसलेले बघून यमुना नखशिखांत हादरते. चंद्राक्का वर ती खूप चिडते देखील. मग न्यूड मॉडेल्स ची असणारी कमतरता, शैक्षणिक आवश्यकता अशा गोष्टी समजावून घेतल्यावर ती थोडी शांत होते. पुढे यमुनेला काम मिळत नसल्याने 'तिनेही न्यूड मॉडेलचे काम करावे' असे चंद्राक्का  सुचवते. मुलाच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांसाठी यमुना नाईलाजाने हे काम करण्यास तयार होते. हे काम करताना मनाची होणारी घुसमट, घालमेल यमुनेचे काम करणाऱ्या 'कल्याणी मुळे' या अभिनेत्रीने मोठ्या ताकदीने दाखवली आहे. न्यूड मॉडेल झाल्यावर यमुनेच्या आयुष्यात कोणती स्थित्यंतरे येतात ते पडद्यावर पाहायला हवे


छाया कदम’ आणिकल्याणी मुळे’ या दोघीचाही मोकळाढाकळा अभिनय चित्रपटाची उंची कमालीची वाढवतो. या दोघींनी जीव ओतून काम केलंय. एम. एफ. हुसेन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तिरेखेशी साम्य असलेली 'मलिक साब' याची भूमिका नसरुद्दीन शहा यांनी साकारली आहे. या भूमिकेतून दिग्दर्शक कलाकाराची बाजू आपल्याला सांगतो. ओम भुतकर, नेहा जोशी, मदन देवधर, किशोर कदम, श्रीकांत यादव हे कसलेले कलाकार आपआपल्या भूमिकेचं सोनं करतात. सायली खरे यांच संगीत, पार्श्वसंगीत चित्रपटातील प्रसंगांना पूरक आहे, काहीसं वेगळं आहे.


हा चित्रपट पाहताना, विशेषतः शेवट पाहताना आपण प्रेक्षक सुन्न होऊन जातो.  नंतर पुढे काही मिनिटे पडद्यावर काहीच नसते. पडद्यावर ना कुठले दृश्य, ना कसले संगीत... केवळ निःशब्द भयानक शांतता ! असतो तो  फक्त विचारांचा कल्लोळ प्रेक्षकांच्या मनात...  प्रत्येक विचारक्षम प्रेक्षक सुन्न होऊन खुर्चीला खिळून राहतो. हा चित्रपट पाहून झाल्यावर मी देखील दोन तीन तास कुणाशी बोललो नाही, बोलू शकलो नाही. असाच सुन्न करणारा शेवट मी 'फॅन्ड्री' या चित्रपटातही अनुभवला होता. आपल्या सारख्या सामान्य सिनेरसिकांनी आपल्या कलाजाणिवा तसेच प्रगल्भता वाढवण्यासाठी असे चित्रपट पाहायलाच हवेत.

राजीव जतकर.

Thursday, 19 April 2018

स्वप्नवत धाड... अर्थात चित्रपट 'रेड'



स्वप्नवत धाड...  अर्थात चित्रपट 'रेड'


मुळात सिनेमा हे माध्यमच मुळी 'अशक्यप्राय गोष्टी सत्य आहेत' असा  आभास निर्माण करून थोडावेळ आनंद मिळवायचा प्रकार आहे, असे मला बरेचदा वाटते. सामान्यांच्या नशिबात क्वचितच येणारे प्रेमप्रसंग, प्रेमविवाह, पहिल्याच नजरेत पटणारी अप्सरेसमान सुंदर प्रेयसी, एकाच वेळी दहा दहा गुंडांना लीलया लोळवणारा नायक वगैरे... अशा आभासी गोष्टींचा आनंद मिळवण्यासाठीच आपल्यासारखी सामान्य माणसे चित्रपट बघत असतात.

मी ही असेच एक स्वप्न नेहेमी बघतो. आपल्या देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला आहे. सर्व सरकारी अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे, विनामोबदला, वेळेत सर्व कामे करीत आहेत. ते नम्र ही आहेत. गुंड राजकारण्यांची भीडभाड ठेवता, त्यांचा कोणताही दबाव मानता सर्व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी आपापले कर्तव्य पार पडत आहेत. पण हे सर्व स्वप्नातच ! वस्तुस्थिती नेमकी उलटी...


अशाच एका स्वप्नात दोन तास रमायचे असेल दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांचा 'रेड' हा चित्रपट बघायलाच हवा. आयकर विभागाने सन  १९८१ मध्ये लखनौ येथील एका हाय प्रोफाईल, राजकारणी व्यक्तीच्या अनिर्बंध साम्राज्यावर घातलेल्या धाडीवर हा चित्रपट बेतलेला आहे. एका साहसी, बेधडक आयकर अधिकाऱ्याची ही  कथा आहे. या आयकर अधिकाऱ्याच्या प्रामाणिक वागणुकीमुळे त्याच्या वारंवार बदल्या होत असतात. लखनौ मध्ये बदली होऊन आलेल्या अमेय पटनाईक (अजय देवगण) या अधिकाऱ्याला कुणी एक खबऱ्या टीप देतो की लखनौ मधील एक स्थानिक राजकीय नेता, खासदार रामेश्वर सिंग (सौरभ शुक्ला) याच्या घरी अमाप अवैध संपत्ती आहे. या अज्ञात खबऱ्याकडून निनावी पत्राद्वारे, फोनवरून ही माहिती मिळताच अमेय लगेचच कमला लागतो. एव्हड्या मोठ्या मात्तब्बर नेत्याच्या घरावर धड घालायची म्हणजे खायचं काम नसतं. या धाडीमुळे कार्यालयातल्या सहकाऱ्यांच्या तसेच स्वतःच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे हे माहित असुन देखील अमेय धाड टाकण्याचा निर्णय घेतो, आणि आपल्या पथकासह धाड टाकतोही...

रामेश्वर सिंग देखील मोठ्या ताकदीचा नेता असतो. तो अमेय पटनाईक आणि सहकाऱ्यांवर दबाव आणतो, त्यांच्यापुढे अडचणींचे डोंगर उभे करतो. पण त्याच्या दबावाला जुमानता हे अधिकारी आपले कर्तव्य बजावत असतात. या जबरदस्त नेत्यांपुढे ते झुकत नाहीत. या धाडीत अमेय च्या हाती काही लागतं का? रामेश्वर सिंग त्याच्या अपमानाचा बदल घेतो का? या प्रश्नाची उत्तरे चित्रपटात मिळतीलच. पण एक कर्तव्यदक्ष अधिकारी त्याचे सहकारी विरुद्ध करबुडवेगिरी करणारा एक उन्मत्त राजकीय नेता यांची लढाई आपल्याला दोन तास चांगलीच खिळवून ठेवते. या लढाईत कोणाचं विजय होतो हे आपल्याला माहिती असूनही आपण आणि प्रेक्षक या कथेत गुंतून जातो.  


सिंघम आणि सिंघम रिटर्न्स प्रमाणे याही चित्रपट 'अजय देवगण' अभिनयाची बाजी मारतो. अभिनयाची त्याची स्वतःची अशी खास शैली आहे. त्याचा स्वतःचा असा चाहता प्रेक्षकवर्ग ही आहे. परीक्षकांच्या पसंतीला तो उतरतोच. त्याने भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. 'इलियाना डिक्रीस' हिने पतीच्या संघर्षात त्याच्या पाठीशी ठामपणे उभारणाऱ्या पत्नीची भूमिका ठीक केलीये. अर्थात अजय देवगण आणि सौरभ शुक्ला च्या अभिनयाच्या वादळात तिची भूमिका नगण्य आहे. तिला चित्रपटात, कथेत फारसा वाव ही नाही.


रामेश्वर सिंग च्या भूमिकेत सौरभ शुक्ला कहर करतो. हा माझा फार आवडता नट आहे. 'जॉली एल.एल.बी.' मधील त्याची न्यायाधीशाची भूमिका पाहून मी त्याच्या प्रेमातच पडलोय. 'रेड' चित्रपटात त्याने उन्मत्त, मग्रूर, कपटी असा राजकीय नेता मोठ्या ताकदीने उभा केलाय. 'राजकुमार गुप्ता' यांचे दिग्दर्शन तसेच चित्रपटाची कथा संवाद लिहिणारे 'रितेश शहा' यांनी चित्रपट उत्कंठापूर्ण बनवला आहे. त्यामुळे दोन तास प्रक्षकांना कथेत गुंतवून ठेवण्यात हि मंडळी यशस्वी ठरली आहेत.

 ही  'रेड' जरी  सत्य घटनेवर आधारित असली तरी सद्यःपरिस्थिती बघता ती स्वप्नवतच आहे. आता ना असे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, ना कुणाला भ्रष्टाचार   कर भरण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे असे स्वप्नवत चित्रपट बघून दोन तास जीवाची करमणूक करून घेणे एव्हडेच काय ते आपल्यासारख्यांच्या सामान्यांच्या हातात राहते.

राजीव जतकर.