Friday, 10 March 2017

अंधश्रद्ध मी ?

अंधश्रद्ध मी ?


       
मागील महिन्यात एक ट्रान्सफॉर्मर चालू करायचा होता.  महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी गुरुवारचा दिवस ठरवला होता. पण मी मात्र ठामपणे  'शनिवारच ट्रान्सफॉर्मर चालू करावा ' अशी आग्रहाची विनंती तेथील अधिकाऱ्यांना केली. सर्वांनाच आश्चर्य वाटले. 'शनिवार हा नाकर्त्याचा वार असून त्या दिवशी काहीतरी विघ्न येण्याची शक्यता असते ' असे मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी हट्टाने 'शनिवारी' तो ट्रान्सफॉर्मर चालू करून घेतला. माझा हा विक्षिप्त हट्ट पाहून एक अधिकाऱ्याने हि 'शनिवारच ट्रान्सफॉर्मर चालू करण्याची काय भानगड आहे ?' असे उत्सुकतेने विचारले. मी खरे तर काही उत्तर देऊ शकलो नाही. पण मनाशीच विचार सुरु झाले की 'मी असे का वागतो आहे ?'.... ' मला समजत नव्हते की माझे असे का होतंय ?

                 विचार करता करता लक्षात आला तो १५ / २० वर्षांपूर्वीचा माझ्या साईटवरील पहिला ट्रान्सफॉर्मर चालू करतानाचा दिवस ! वरील प्रसंग जसाच्या तसा घडलेला. पुढे सुद्धा बऱ्याच वेळा या घटनांची पुनरावृत्ती झाली. ( योगायोगाने म्हणा अथवा माझ्या हट्टामुळे म्हणा माझ्या व्यावसायिक कारकिर्दीतील बहुतांश ट्रान्सफॉर्मर यंत्रणा ह्या नाकर्त्या वारी च म्हणजे शनिवारीच कार्यान्वीत झाल्या ) विचार सुरूच राहिले.

               आमच्या कुटुंबात, तसेच मित्र परिवारात मी थोडा नास्तिकच ! एकूणच धर्माबद्दल , देवदेवतांच्या संकल्पनेबद्दल , रूढी परंपरांच्याबद्दल माझी मते कुणालाही फारशी पटणारी विक्षिप्त वाटणारी आहेत असे सर्वांचे म्हणणे. हट्टाने टोकाला जाऊन रूढी तोडण्याची मला मनापासून आवड. समाजातील अंधश्रद्धा बघून मी जाम अस्वस्थ होतो. अशाच टोकाला जाऊन रूढी तोडण्याच्या मानसिकतेतून माझ्या वरील नमूद केलेल्या अंधश्रद्धा निर्माण झाल्या असाव्यात. मुळात श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती हे कसे ओळखायचे? ह्या दोन्हीत नेमका फरक कोणता? मला वाटते. डोळस असते ती श्रद्धा आंधळेपणाने स्वीकारलेली ती अंधश्रद्धा ! जी माणसाला व्यापक बनवते, धर्म, जात ह्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून पहायला शिकवते ती श्रद्धा! या उलट जी माणसाला संकुचित विचार करण्यास प्रवृत्त करते ती अंधश्रद्धा! मनात विचार येतच राहिले...

              श्रद्धेमुळे माणसाला मानसिक आधार नक्कीच मिळतो. प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर श्रद्धा असते. श्रद्धेमुळे आत्मविश्वास वाढून माणूस ठाम पणे यशाकडे वाटचाल करतो. पण श्रद्धेला तर्काची दृष्टी नसली की  त्याची बनते अंधश्रद्धा. माणूस अंधश्रद्ध झाला कि त्याला स्वतःच्या शक्तीचा विसर पडू लागतो तो नैसर्गिक घटनांवर सुद्धा चुकीच्या पद्धतीने विश्वास ठेवू लागतो . मग त्यातूनच

- मांजर आडवी गेल्याने कामे होत नाहीत .
- दृष्ट लागणे किंवा कोणाची तरी वाईट नजर लागणे. (शनिवारी लक्ष्मी रोडवर चक्कर मारा... लिंबू मिरच्यांचा खच पडलेला असतो…)
- रात्री कुत्र्यांचे रडणे अशुभ असते.
- देवाला नवस बोलणे किंवा बोललेला नवस फेडला नाही तर देवाचा कोप ?
- दक्षिणेला घराचा अथवा ऑफिसचा दरवाजा असणे म्हणजे अशुभ. ( माझ्या ऑफिसचा दरवाजा गेली २५ वर्षे दक्षिणेलाच आहे. माझे उत्तम चालले आहे. )
- प्रत्येक गोष्टीचा शुभारंभ करताना उठ सुठ पूजा अर्चा करणे. ( मी माझ्या राहत्या घराची व ऑफिसची वास्तुशांती कधीही केली नाही )  नुकतीच वर्तमान पत्रात वाचलेली एक बातमी... मुठा नदीत पुष्पहार नारळ अर्पण करून, तसेच नदीच्या पात्रात पणत्या सोडून एका राजकीय पक्षाच्या कमिटी तर्फे नदी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली . (म्हणजे नदी स्वच्छतेची शपथ व शुभारंभ नदीचे पाणी घाण करूनच करण्यात आली.  आता बोला... )
- उठसुठ मुहूर्त बघून कामे करणे. वास्तविक सर्व वेळा, वार, दिवस जर देव नामक विश्वकर्त्याने बनवले असतील तर ते शुभ च असणार ना.
        
थोडक्यात आपली करत असलेल्या कामावर दृढनिष्ठा किंवा श्रद्धा असेल तर त्याची सुरवात करण्यासाठी कोणताही दिवस चांगलाच असतो, मग तो तथा कथित नाकर्त्याचा वार शनिवार असला तरीही...
      
विचार करताना असे लक्षात आले की माझी अजून एक विक्षिप्त अंधश्रद्धा आहे कि 'मांजर आडवे गेल्यावर माझी कामे नक्की होतात. हा... हा...  मला समजत नव्हते की माझे असे का होतंय ?

राजीव जतकर.



1 comment:

  1. छान लेख
    श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नकोच
    या मतावर मी ठाम आहे

    ReplyDelete