Wednesday, 18 September 2019

माझे ओसाड गावाचे राज्य

 माझे ओसाड गावाचे राज्य
                                              (अर्थात इकॅम पुणे चे अध्यक्षपद.)
            
वास्तविक लिडर किंवा पुढारी होण्याचा माझा पिंड नाही. मी तसा कार्यकर्त्याच्या भूमिकेत जास्त रमणारा. कारण लिडरशीप साठी लागणाऱ्या अनेक गुणांपैकी आक्रमकता, थोडा धूर्तपणा, महत्वाकांक्षा यासारखे गुण माझ्यात नाहीत असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यामुळेच कि काय कुणास ठाऊक माझ्या २० वर्षाच्या रोटरीत असण्याच्या काळात सुद्धा मला कधीही रोटरी क्लब प्रेसिडेंट व्हावेसे वाटले नाही. रोटरी क्लब म्हणजे सुद्धा मला नेहमी ४०/५० लोकांचे एक ओसाड गावच वाटत असे. तिथेही लुटीपुटीचा प्रेसिडेंट, सेक्रेटरी, त्याचे संचालक मंडळ, त्या साठी लुटुपुटीच्या निवडणूका वगैरे असत. प्रेसिडेंट होणे म्हणजे फार काही ग्रेट आहे असे मला वाटत नसे.

मी विद्युत ठेकेदार (इलेकट्रीकल कॉन्ट्रॅक्टर ) असल्याने माझा व्यवसाय सुरु केल्यानंतर लगेचच मी ECAM  म्हणजेच इले. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या १९२५ साली स्थापन झालेल्या सर्वात जुन्या अशा असोसिएशनचा सभासद झालो. तो तरुणपणाचा काळ होता. इकॅमच्या पुण्याच्या ऑफिस मध्ये मी मधून मधून जात असे. पण मी फारसा ऍक्टिव्ह नव्हतो. त्या वेळी मला असे जाणवले कि तेथे ऍक्टिव्ह असलेले सभासद, पदाधिकारी हे बहुतांशी इंडस्ट्रियल कामे कराण्यापैकी होती. त्यामुळे इंडस्ट्रियल कामांची किंवा त्या संबंधी येणाऱ्याच प्रश्नांची चर्चा प्रामुख्याने होत असे. मी रेसिडेन्शियल (घरगुती ) वायरिंगची कामे करीत होतो. त्यामुळे त्या वेळी असोसिएशनच्या कामात मला फारसा रस वाटत नसे. साधारण १९८५ चा काळ होता तो.

विश्वनाथ जोशींचे मार्गदर्शन : आमच्या व्यवसायात इंडस्ट्रियल कामे करणारी एक जमात आहे. ह्या जमातीतले ठेकेदार स्वतःला खूप स्पेशल समजतात. त्यामुळे घरगुती वायरिंगची कामे करणाऱ्या ठेकेदारांना ते थोड्या खालच्या दर्जाचे समजतात. अशी भावना माझ्या सकट इतर ही अनेक विद्युत ठेकेदारांच्या मनात होती. मग अशा समविचारांच्या मित्रांचा ग्रुप तयार झाला. त्यात कै. शिरीष देवधर, निखिल गोरे, अनंत चौडे, राम जोगदंड, प्रशांत मराठे असे अनेक मित्र बालगंधर्व मागच्या कॅफे टेरिया या रेस्टारंट मध्ये आठवड्यातून एकदा जमत असत. त्यात बहुतांशी इकॅमचे सभासद नव्हते. व्यावसायिक प्रॉब्लेम्स चर्चिले जायचे. जोरदार चर्चा व्हायच्या. पण २०/२५ मित्रांच्या चर्चेतून काहीच घडत नव्हते
.
 एकदा आम्ही असेच कॅफे टेरियात गप्पा मारत बसलो होतो. त्या वेळी अचानक विश्वनाथ जोशी नावाचे एक वयस्कर असे विद्युत ठेकेदार हातात गुलाबाची फुले घेऊन आले. प्रत्येकाला एक एक फुल देऊन आमच्यात बसले. त्यांनी आमचे प्रश्न समजावून घेतले. बरेच मार्गदर्शनही केले, सांगितले कि स्वतंत्र असोसिएशन चा विचार सोडा सर्वांनी आधीच अस्तित्वात असलेल्या इकॅमचे सभासद व्हा, आपले प्रश्न सोडवा. आपल्या सर्वांसाठी इकॅमचा प्लॅटफॉर्म तयारच आहे. आम्हा सर्वांना त्यांचे म्हणणे पटले. मी इकॅमचा सभासद होतोच; माझे मित्र ही इकॅम पुणे मध्ये सामील झाले. आम्हा घरगुती वायरिंगचे काम करणाऱ्या सभासदाचे प्रश्न ही आता चर्चेला जाऊ लागले.

 विश्वनाथ जोशी बऱ्याच वेळा माझ्या ऑफिस मध्ये येत असत ते मला सांगत कि "तुम्ही तरुणांनी आता पुढे झाले पाहिजे. संघटनेतील निवडणूका तुम्ही लढवल्या पाहिजेत. संघटनेच्या निरनिराळ्या पदावर काम केले पाहिजे. संघटनेचे काम समजावून घेतले पाहिजे. तुम्ही पुढे संघटनेचे अध्यक्ष ही होऊ शकता." वगै, वगैरे ' अध्यक्ष पदच काय पण कोणतेच पद नको. अशी माझी मानसिकता असल्याने त्या आघाडीचा मी विचार कधीच केला नाही, पण इकॅम मध्ये कार्यकर्त्यांच्या भूमिकेत काम करत राहिलो. राजकारणापासून लांबच राहिलो. आमचा सर्व ग्रुप इकॅम मध्ये सामील झाल्याने आमचे 'कॅफे टेरिया' मध्ये भेटणे बंद झाले. आमच्या एकूण ग्रुप पैकी मी कै. शिरीष देवधर पुढे संघटनेत कार्यरत राहिलो. शिरीष देवधर मध्ये लिडरशीप साठी लागणारे अनेक गुण होते. त्याच्या कडे संघटन कौशल्य, आक्रमकपणा, मुत्सुद्दीपणा वगैरे गुण होते. त्याच्या ह्या नेतृत्व गुणांच्या बळावर तो पुढे नक्की इकॅम चे नेतृत्व करेल. अशी मला खात्री होती. पुढील काळात तो इकॅमचा अध्यक्ष झाला देखील! आणि त्याच्या कार्यकाळात त्याने स्वतःला सिद्ध देखील केले.

 इकॅम पुणे विभागाचे एक छोटेखानी ऑफिस शुक्रवार पेठेतील राजा केळकर संग्रहालयाच्या जवळ असलेल्याभारत भवनह्या इमारतीत होते. सुरवातीच्या काळात रानडे, साने, सरदेसाई, स्मॅशचे चितळे, चिंतामणी बापट, कै. सुधाकर शेठ . मंडळी खूप काम करत असत. ह्याच मंडळींनी इकॅम पुणे विभागाच्या स्थापनेची मुहूर्त मेढ रोवली. इकॅम पुणे विभाग नावारूपाला आणला. नावारूपाला आलेली संघटना चालवणे हे खूप सोपे, पण संघटना सुरु करणे यासारखे कठीण काम ह्या मंडीळींनी केले. ही सर्व नेते मंडळी आमचे आदर्श होते. मुळात २०० ते २५० रुपये वार्षिक सभासद वर्गणी असलेली संघटना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे ही सोपी गोष्ट नाही. मला आठवणारा फंड रेझींगचा कार्यक्रम म्हणजे १९८९-९० साली इकॅम ने आयोजित केलेले विद्युत साहित्याचे प्रदर्शन ! त्या वेळचे नंदकुमार वाडेकर, शरद बावडेकर, पटवर्धन, सुधाकर शेठ, श्री.चितळे, ओसवाल यांनी हे प्रदर्शन यशस्वी करण्यास मोठा हातभार लावला. डेक्कन वरील हॉटेल पूनम मधेही प्रदर्शनादरम्यान तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अतिशय यशस्वी झालेल्या ह्या कार्यक्रमामुळे जमलेल्या रकमेतून मग संघटनेचे स्वतःचे ऑफिस फर्निचर करण्यात आले. पुण्यातील नागरिकांचा या प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या नंतरच्या काळात असे कार्यक्रम क्वचितच झाले.

इकॅम अध्यक्षपदाचे भोयी... शिस्तप्रिय मांदळे घोडके -

          इकॅम पुणे विभागाच्या माझ्या आधीच्या अध्यक्षांच्या पैकी मला साधारण चिंतामणी बापट यांचे वर्ष तसे अंधूकच आठवते आहे. पण सुरेश मांदळे यांच्या वर्षात मी इकॅम मध्ये जाऊ लागलो. याचे महत्वाचे कारण म्हणजे इकॅम पुणे ऑफिस मधील सभासदांच्या नियमित होणाऱ्या बैठका! तशा बुधवारच्या ह्या बैठका आधीच्या काळातही होत असत. पण मांदळेच्या काळात त्या नियमितपणे बहुसंख्य सभासदांच्या (बहुसंख्य म्हणजे १५/२० सभासद) उपस्थितीत होऊ लागल्या. अनेक सभासद बुधवारच्या मिटींग्जच्या निमित्ताने एकत्र येऊ लागले. अनेक विषयावर चर्चा होउ लागल्या या नियमित बैठकांचे श्रेय श्री मांदळे यांना द्यावेच लागेल. त्यांच्या काळात सभासदांच्या मधे एक प्रकारचा उत्साह संचारला होता.

    त्या काळातले इकॅमचे खजिनदार श्री. अनिल घोडके यांनी इकॅम पुणे चे कार्यालयीन व्यवस्थापन कमालीचे सुधारले. मांदळे, घोडके या दोघांनी इकॅम पुणेला एक प्रकारची शिस्त आणली. (पुढील काळात मांदळेच्या विरोधात मी इकॅमच्या अध्यक्ष पदासाठी नाईलाजाने निवडणूक लढवली अर्थात त्याची कारणे वेगळी होती. ती पुढे येतीलच..


शिरीष देवधरांचा चटका लावून जाणारा मृत्यू :
                 
शिरीष देवधर हा अतिशय वेगवान विचार करून, धडाडीने निर्णय घेऊन, तातडीने अंमल बजावणी करणारा असा नेता पुढील वर्षासाठी इकॅम पुण्याचा अध्यक्ष झाला. मांदळे देवधरांच्या काळात मी इकॅम पुण्याच्या संचालक मंडळामध्ये छोट्या मोठ्या पदावर काम करू लागलो. देवधरांच्या नेतृत्व कौशल्याने माझ्या सारखे अनेक कार्यकर्ते कामात रस घेऊ लागले. देवधरांचे वैशिष्ट्ये म्हणजे इतर कोणावरही अवलंबून राहता कोणतेही काम स्वतः करून ते काम तडीस न्यायचे तो काळ पेजर्सचा होता. प्रत्येक मिटिंगची किंवा कामाची आठवण पेजरवर निरोप देऊन होऊ लागली होती. गणेश कला क्रीडा येथे विद्युत साहित्याचे प्रदर्शन हा एक महत्वकांक्षी प्रोजेक्ट देवधरांनी हिमतीने केला. पण दुर्दैवाने प्रेक्षकांनी या प्रदर्शनाकडे पाठ फिरवली होती. पण देवधरांचे कष्ट वादातीत होते. परंतु पुढे देवधरांच्या आकस्मित झालेल्या निधनाने इकॅम पुणेची घोडदौड काहीशी थांबली. आम्ही सर्वचजण काहीसे दिग्मुढ झालो. काहीसे गोंधळलो. आता पुढे काय....अशा परिस्थीतीत सुनील गायकवाड यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणुन सुत्रे सांभाळली. सुनील गायकवाड यांना खुपच कमी वेळ मिळाला, त्यामुळे त्यांच्या काळात फारसे काही घडल्याचे स्मरत नाही

 इकॅम पुणेचे रौप्यमोहोत्सवी वर्ष आणि वामन भुरे:

 सुनील गायकवाड यांच्या नंतर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी वामन भुरे यांच्या बरोबर मी सुद्धा अर्ज देण्याचे ठरवले. पण प्रामाणीक प्रमाणे सांगायचे झाले तर माझी मानसीक तयारीच नव्हती. मांदळे यांनी देखील अर्ज करायचे ठरवले आहे असे समजले काहीतरी राजकारण शिजत होते. बहुदा ! मांदळे आणि भुरे यांच्यात काहीतरी कुरबुरी होत्या. या राजकारणात मला रस नव्हता. मी माझा अर्ज मुद्दाम, जाणीवपुर्वक उशीरा दिला. त्यामुळे तो अवैध ठरला. मांदळेनी सुद्धा अर्ज भरला नाही. आणि वामन भुरे इकॅम पुणेचे बिनविरोध अध्यक्ष झाले. माझ्यावरची अध्यक्षपदाची बला टळली म्हणुन मी सुटकेचा निःश्वास सोडला .

        वामन भुरेच्या काळात मला भावलेला कार्यक्रम म्हणजे कला महाविद्यालयातील तरुण विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यासाठी विद्युत सुरक्षा या विषयावरील चित्रकला / पोस्टर स्पर्धा! भुरेंच्या सक्षम अशा नेतृत्वाखाली सर्वांनीच कष्ट घेतले. मला विशेष जाणवले ते नरेंद्र शिंदेकरांचे कष्ट ! त्यांनी अनेक शाळांना भेटी देऊन स्पर्धेची माहीती देऊन विद्यार्थ्यांनी विद्युत सुरक्षेवरील सुंदर चित्रे मिळवली. अनेक सुंदर चित्रांच्या मधुन विजेत्यांची निवड करणे खुप अवघड होते. विजेत्यांना बक्षीसे देण्यासाठी बालगंधर्व रंग मंदिरात एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते सकाळ वृत्तपत्राचे तात्कालीन संपादक श्री. यमाजी मालकर. हे काम मनाला समाधान देणारे होते.

हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन धमाल करायची अशा उद्देशाने एक संचालक मंडळ कार्यकर्ते यांची बैठक घेतली गेली. ती बैठक त्यात झालेला गोंधळ मी कधीच विसरू शकणार नाही. या बैठकीत कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली होती. एकमेकांवर दोषारोप झाले अतिशय चढ्या आवाजात, असभ्य भाषेत भांडणे झाली. मी खूप निराश झालो. सर्वांना समजावून सांगायचा मी प्रयत्न केला. पण व्यर्थ ! एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणाने रंग घेतला होता.

अशाच वातावरणात इकॅम पुणेचे रौप्य मोहोत्सवी वर्ष आले. वामन भुरे यांचे अध्यक्षपदाचे शेवटचे वर्ष होते. रौप्य मोहोत्सवी वर्षाचा आरंभ सांगता छान कार्यक्रमाने साजरी करायची ठरली. सर्वजण पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. अर्थात दुर्दैवाने या कामाला देखील घाणेरडया राजकारणाची किनार होतीच. पण काही गोष्टींना पर्याय नसतो. पण एकंदरीत हे दोन्ही कार्यक्रम भव्य स्वरूपात झाले. वामन भुरे यांचा भव्य कार्यक्रम करण्याचा हातखंडा होता. या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने सोविनियर्स काढण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी छोट्या प्रमाणात विद्युत साहित्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. वामन भुरेचा मोठा जनसंपर्क नेतृत्व आणि संचालक मंडळातील संचालक, कार्यकर्ते यामुळे इकॅम पुणेच्या गंगाजळीत भरभक्कम भर पडली.


एकीकडे चांगले काम होत असताना दुर्दैवाने पराकोटीची भांडणे, कुरघोड्यांचे राजकारण हे ही चालूच होते. पुणे विभागाचे, इकॅम च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाबरोबर सुद्धा तणावपूर्ण असे संबंध झाले होते. इकॅम मुख्य कार्यालय इकॅम पुणे यांचे विळ्या भोपळ्यांचे संबंध हे तसे पूर्वापार चालत आलेच होते. पण ते सुधारण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होत नव्हता. किंबहुना दोन्ही बाजूंनी भांडणांना खतपाणीच घातले जात होते. या काळात एकूणच भांडणांना राजकारणाने अत्युच्य पातळी गाठली होती. भांडणामुळे माणसे, मित्र दुरावतात हे सत्य कुणाच्याच कसे लक्षात येत नाही? आधीच ओसाड गाव असलेल्या इकॅम मध्ये अधिक चांगली माणसे सभासद कशी येणार? या भांडणाच्या मुळे राजीव शास्त्री या चांगल्या सभासदाने इकॅम चे नावच टाकले. तो येइनासा झाला. इकॅम चे सभासद वाढण्याची कारणे म्हणजे ही भांडणे राजकारण आहेत असे माझे ठाम मत आहे.


माझी अध्यक्ष पदाची निवडणूक:
              वामन भुरे यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपत आला होता. वामन भुरेंची शेवटची वार्षिक सर्व साधारण सभा नोव्हेंबर २००९ ला जाहीर झाली होती. त्यापूर्वी नवीन अध्यक्ष पदासाठी निवडणुकाही जाहीर झाल्या होत्या. त्या आधी इकॅम पुणे चे जेष्ठ सभासद श्री. सुहास साने माझ्याकडे आले. जवळजवळ तासभर माझ्याशी बोलत होते. मी अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवावी असे कळकळीने सांगत होते. मी नाही म्हणत राहिलो.... खूप वेळ नाही म्हणत राहिलो. आणि एका बेसावध क्षणी 'हो' म्हणालो. काही कार्यरत असलेल्या सभासदांशी नंतर चर्चा करून अर्ज करण्याचे ठरले. साने, मिलिंद नाईक वगै. काही मंडळींनी 'आम्ही आहोतच, तुम्ही पुढे व्हा' असे आश्वासन दिले. अध्यक्ष पदाचा कार्यकाळ तब्बल वर्षाचा असल्याने हे काम कसे निभावेल अशी शंका छळू लागली. त्या दिवशी घरी गेल्यावर मी निवडणूक लढण्याचा निर्णय ऐकताच अलका (बायको) वैतागली म्हणाली हे म्हणजे बैल मुझे मारअसे झाले.

               या निवडणुकीत पुन्हा वामन भुरेचा अर्ज दाखल झाला. त्यामुळेच की काय सुरेश मांदळे यांनी देखील अर्ज भरला. अध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत अर्ज करून मी सुद्धा रिंगणात उडी घेतली. दोन माजी अध्यक्षांचे अर्ज दाखल झाल्यामुळे मी चक्रावलो. अर्ज परत घेण्याच्या तारखेपर्यंत वामन भुरे यांनी अर्ज मागे घेतला. मी विरुद्ध सुरेश मांदळे अशी लढत निश्चित झाली.

                      इकॅमची निवडणूक पद्धत फार विचित्र आहे. प्रत्येक सभासदाला मत पत्रिका पोस्टाने पाठवली जाते. प्रत्येक सभासदाने मतपत्रिकेवर आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावापुढे फुली मारून मतपत्रिका पाकीट बंद करून इकॅम च्या ऑफिस मध्ये आणून द्यायची असते.

          संघटनेप्रती पराकोटीची उदासीनता असलेल्या इकॅम च्या सभासदांच्या कडून अशा प्रकारे ऑफिसमध्ये मतपत्रिका आणून मतदान मतदान करण्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचेच असते. त्यामुळे प्रत्येक सभासदांकडे जाऊन त्याच्या ऑफिस मधील मतपत्रिका हुडकून, मतपत्रिकेवर सही शिक्के घेऊन मतपत्रिका गोळा कराव्या लागतात. जो उमेदवार सर्वप्रथम 'त्या सभासदांकडे पोहचेल त्याच्याकडे मतपत्रिका सभासद देतात. त्यामुळे ज्या उमेदवाराकडे पळणारे कार्यकर्ते जास्त तो उमेदवार निवडून येतो अशी परिस्थिती !
    त्या वेळी माझ्या सुदैवाने माझ्याकडे चांगले भरपूर कार्यकर्ते असल्याने मी भरपूर मतांनी निवडून आलो. वास्तविक सुरेश मांदळे यांना अध्यक्ष पदाचा भरपूर अनुभव होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चांगले कामही केले होते. सर्व सभासद त्यांना ओळखतही होते. माझ्यापेक्षा ते नक्कीच चांगले उमेदवार होते. पण कदाचित इकॅम मधील पराकोटीची भांडणे राजकारण यामुळेही असेल, माझ्यासारख्या राजकारणात नसलेल्या उमेदवाराला सभासदांनी पसंती दिली. निवडणुकीच्या काळात सर्व सभासदांशी असलेला संपर्क कार्यकर्त्याच्या बरोबरीने केलेली धावपळ या मुळे ही मला भरपूर मते पडली. (म्हणजे आम्ही गोळा केली). मला आठवतंय.... एकूण ४५० सभासदांच्या पैकी एकूण ३०८ सभासदांनी मतदान केले. पैकी सुरेश मांदळे यांना ९४ मते मिळाली मला २१४ मते मिळून मी निवडून आलो. एकूण काय मी माझ्या गुणवत्ते मुळे किंवा माझ्या चांगल्या प्रतिमे मुळे निवडून आलेलो नव्हतो तर केवळ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच निवडून आलो, किंवा कदाचित म्हणतात नादोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभइकॅम पुणे च्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून माझे नाव जाहीर झाले. मावळते अध्यक्ष वामन भुरे यांच्याकडून अध्यक्ष पदाची सूत्रे माझ्याकडे आली. ही वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १४-११-२००९ रोजी 'रेसिडेन्सी क्लब 'येथे पार पडली.

इकॅम - एक ओसाड गाव:

 इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम ) ही आमची संघटना मला नेहमीच एक 'ओसाडगाव' वाटत आले आहे. त्यातील पुणे विभागाचा विचार केला तर 'पुण्यात अनुज्ञाप्ती (लायसेन्स) धारक  इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स अंदाजे २५०० आहेत. पैकी इकॅम संघटनेचे सभासद फक्त ५५० आहेत. (मी अध्यक्ष पदाची सूत्रे घेईपर्यंत हि संख्या गेली अनेक वर्षे ४०० ते ४५० एवढीच होती.) या सभासदांच्या पैकी १५ ते १८ सभासद हे संचालक मंडळात असतात. अध्यक्ष संचालक मंडळ हे ओसाड गाव चालवतात, बाकी तमाम सभासदांना संघटनेबद्दल काही घेणे देणे नसते. संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना सभासदांची उपस्थिती वाढवणे हे एक दिव्य काम असते. संघटनेची वार्षिक वर्गणी भरल्यामुळे होणारी सभासदांची गळती रोखणे हे ही एक मोठे आव्हानच असते.


खरे तर एकत्र येऊन संघटित रित्या आपआपल्या व्यावसायिक अडचणी सोडवून स्वाभिमानी पद्धतीने कामे करण्याऐवजी आमचे इलेकट्रीकल कॉन्ट्रॅक्टर बांधव महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर सरपटणेच पसंत करतात. लाच दिल्यामुळे अडचणी सुटतात खऱ्या, पण काळ सोकावतो हे आमच्या कधी लक्षात येणार? या अशा परिस्थितीमुळे संघटनेची गरज काय? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे संघटनेमध्ये विद्युत ठेकेदार सभासद कधीच तक्रारी करत नाहीत. सभासद संघटनेत फिरकतच नाहीत. मग संघटनेचे काम कोणत्यातरी विद्युत उत्पादन करणाऱ्या कंपनीला विनंती करून चर्चा सत्रे, कार्यशाळांचे आयोजन करणे, किंवा सभासदांचे ज्ञान वाढवणे इतपतच मर्यादीत स्वरूपाचे राहते. इकॅमने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना सुद्धा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेला देखील ५५० सभासदांच्या पैकी १०० च्या आसपासच सभासद हजेरी लावतात (अशा चर्चासत्रांना रात्रीचे जेवण अपेयपान असल्यास काही प्रमाणात हि संख्या वाढते.) अशा ह्या ओसाड गावाचे नेतृत्व मला तीन वर्षासाठी करायचे होते. काहीशा काळजीतच मी कामकाजाला सुरवात केली......  


प्रत्यक्ष कामाची सुरवात :-

राजकारणासारख्या आणि निवडणुकी सारख्या मला आवडणाऱ्या प्रक्रियेला अपरिहार्य पणे  समोर जाऊन काहीतरी वेगळे आणि भरीव काम करण्याच्या इच्छेने मी माझ्या अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली. निवडुन आल्यावर पहिल्याच दिवशी इकॅमच्या ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन माझे स्वागत केले. मला खुप बरे वाटले. इकॅम मधे तशी प्रथाच आहे. कोणतेही काम स्वतः केल्याशिवाय त्या कामातल्या अडीअडचणी खऱ्या अर्थाने समाजात नाहीत. मी प्रथमच इकॅमचे आर्थिक व्यवहार, कार्यालयीन कामे, कार्यालयीन प्रत्रव्यवहार यात रस घेऊ लागलो. माझ्या बरोबर सचिव (सेक्रेटरी) संजय कोल्हटकर, खजिनदार प्रकाश जाधव वगैरे कार्यालयीन कामाचा अनुभव असलेली मंडळी मदतीला होती. त्यामुळे या गोष्टींच्या कामातील लक्ष थोडे कमी करून 'इकॅमची सामाजातील प्रतिमा तयार करणे, इकॅम पुणेची आर्थिक बाजु भक्कम करणे, पुण्यातील विद्युत ठेकेदारांच्या मनातील इकॅमची प्रतिमा चांगली करून त्यांचा सभासदांचा सहभाग वाढवणे या सारख्या कामावर मी लक्ष केंद्रीत करायचे ठरवले. या ओसाड गावाला कार्यरत करून त्याचे नंदनवन करण्याचे काम सोपे नव्हते.

माझ्या आधिच्या  काळातील अध्यक्षांच्या चांगल्या कामगीरीला मला पुढे घेऊन जायचे होते. सुरेश मांदळे यांच्या काळातील कार्यालयीन कामातील भरीव कामगीरी, वामन भुरे यांच्या काळातील मोठ्या प्रमाणात झालेले आर्थिक स्थैर्य ह्यात मला काहीतरी अधिक काम करून दाखवायचे होते. इकॅम ही संस्था समाजाभिमुख करणे हे माझे ध्येय मी ठरवले. माझ्या आधीच्या काळातील सर्व अध्यक्षांनी संचालकांनी इकॅमसाठी उत्तम काम केले होते, पण दुर्देवाने हे चांगले काम समाजापर्यत तर सोडाच, पण आमच्या सभासदांच्या पर्यंतही ते पोहोचले नव्हते. दुर्देवाने राजकारण, भांडणे मात्र आपोआप, कोणतेही कष्ट घेता सर्व सभासदांना गॉसिपिंग मुळे कळत होती. त्यामुळे कळत इकॅम प्रती एक प्रकारचे नकारात्मक वातावरण वर्षानुवर्षे तयार झालेले होते. हे वातावरण बदलण्याचे उद्दिष्ट मी ठेवले, आणि त्या उद्देशाने पहिले पाऊल उचलले 'इकॅम-पुणे वार्ता' नावाचे त्रैमासिक प्रकाशीत करण्याचा प्रस्ताव आमच्या संचालक मंडळा पुढे ठेवला.

बहुआयामि त्रैमासिक इकॅम-पुणे वार्ता :

 इकॅम पुणे वार्ता या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यामागे बऱ्याच फायद्यांचा विचार माझ्या मनात होता. इकॅमच्या सभासदांना एकत्रीत आणणे, व्यावसायीक अडचणीचे या त्रैमासिकातुन आदानप्रदान करणे, सभासदांचे विद्युत क्षेत्रातील ज्ञान वाढवणे, ज्ञान अद्ययावत ठेवणे, व्यावसायात नवीन आलेल्या विद्युत उपकरणांची माहीती देणे, विद्युत क्षेत्रात सचोटीने काम करून चांगले यश मिळवणाऱ्या सभासदांचे कौतुक या त्रैमासिकातुन करणे वगै. उद्दिष्टे इकॅम वार्ताची होती.

कोणतीही वाईट गोष्ट चव्हाट्या वर आली की वाईट गोष्टींना चाप बसतो. महावितरण असो किंवा  विद्युत निरीक्षण कार्यालय असो यांचे कार्यालयीन अनागोंदी , भ्रष्टाचारया विषयीचे लेख लिहून वाईट गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या असेही माझ्या डोक्यात होते. इकॅम पुणे वार्ता हे त्रैमासिक संपुर्णपणे मराठीतुन करायचे असेही माझ्या मनात होते. हे त्रैमासिक फक्त इकॅमच्या  ४५० सभासदांना तर पाठवायचे पण सभासद नसलेल्या सर्व म्हणजे जवळजवळ २५०० विद्युत ठेकेदारांना ते पाठवायचे असाही प्रस्ताव मी माझ्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला. सुरवातीला संचालक मंडळाकडुन या प्रस्तावाचे थोडे थंडपणेच स्वागत झाले. अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. अर्थात हे सर्व अपेक्षितच होते आणि हे आवश्यक ही असते. कधी कधी नकारात्मक दृष्टीने एखाद्या गोष्टीकडे पाहिल्यास त्यातील शंका, अडचणी पुढे येतात. उदाहरणार्थ " इकॅम पुणे वार्ता नसलेल्या विद्युत ठेकेदारांना कशाला पाठवायचा?" असा एक नकारात्मक सूर बैठकीत वाजला. ४५० सभासदांच्या पर्यंत पोहोचणाऱ्या त्रैमासीका पेक्षा ३००० विद्युत ठेकेदारांच्या पर्यंत पोहोचणाऱ्या त्रैमासिकाला जास्ती जाहिराती मिळतील ही वस्तुस्थीती  संचालक मंडळातील माझ्या सहकाऱ्यांना पटवून दिल्यावर ह्या बाबतीतला विरोध मावळला जाहिराती कशा मिळवायच्या, त्रैमासिकात कोणकोणती सदरे असावीत, विद्युत क्षेत्र व्यावसायिक सदरांच्या व्यतिरिक्त काही छापायचे का नाही. करमणुकीसाठी इतरही सदरे करावीत की नको ? वगैरे अनेक बाबींवर सखोल चर्चा झाल्या, आणि काहीश्या साशंक नजरेनेच ह्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली.
     
इकॅम पुणे वार्ता प्रकाशित करायचे ठरले खरे, पण खरे आव्हान पुढेच होते. ज्या ३००० विद्युत ठेकेदारांना ते पाठवायचे असे आम्ही ठरवले होते त्यांची नावे पत्ते आमच्याकडे उपलब्ध नव्हते. ही माहीती कुठे मिळणार? मग लक्षात आले की विद्युत निरीक्षक कार्यालयात ही यादी मिळु शकते. मग मी तात्कालीन विद्युत निरीक्षकांना भेटून त्यांना 'सदर यादी मिळावी ' अशी विंनती केली. सुरवातीला अर्थातच नकार मिळाला. मग उद्देश सांगीतल्यावर काही अटीवर ही मिळाली. त्यासाठी देखील बरेच कष्ट घ्यावे लागले
.

पुढील आव्हान होते इकॅम पुणे वार्ता ची आर्थिक बाजु सांभाळण्याचे ! कारण हे काम पैशाशिवाय उभे राहणे शक्यच नव्हते. तसे पहायला गेले तर वामन भुरेंच्या काळात इकॅम पुणेची आर्थिक बाजु भक्कम झाली होती. पण मी असे ठरवले की भुरे यांनी उभ्या केलेल्या गंगाजळीला धक्का लावता नवीन फंड्स निर्माण करायचे हे कार्य चालवायचे. मग जाहिराती मिळवण्यासाठी भटकु लागलो. सुदैवाने माझे ऑफिस इलेक्ट्रिकल मार्केटच्या जवळ असल्याने जाहिराती विद्युत दुकानदार, विद्युत साहित्याचे उत्पादक कंपन्यांचा पाठपुरावा मला करता आला. या बरोबरच अध्यक्षीय, संपादकीयमहावितरणच्या बातम्या, श्रद्धांजली, अभिनंदन, 'इतरही थोडे बोलू काही', माझा अनुभव, अशा नावांची सदरे  करण्याची ठरवली. या साठी संपादक म्हणुन राजेंद्र सिन्नरकर यांची नेमणुक झाली. मग सिन्नरकरांच्या बरोबरीने या सदारांचे मराठीतून लेखन करू लागलो. 'स्वरूप मुद्रण' नावाच्या एका मुद्रणाचे काम करणाऱ्या श्री. संदीप सोनवणे यांच्या वारंवार बैठका होऊ लागल्या. श्री. सोनवणे यांचा प्रिटींग प्रेस कार्यालय अप्पा बळवंत चौकात असल्याने मला माझ्या ऑफिसमधुन माझ्या सोयीप्रमाणे वेळ काढून हे काम करणे सोपे गेले. बातम्या, लेख, जाहिराती वगै. ची आर्कषक रचना (layout) करण्यासाठी मी स्वरूप मुद्रण मधे तासनतास बसत असे. हे सर्व काम करत असताना माझ्या सहकाऱ्यांच्याकडून मला माफकच मदत होई. स्वाभाविकच होते ते ! कारण आम्ही विद्युत ठेकेदार साईटवर रमणारे…  साहित्य, वाचन, लिखाण, पत्रकारिता वगैरे. विषय आम्हाला अवघडच. त्यातच व्यवसाय सांभाळून ह्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायचा त्यामुळे मी जन्माला घातलेले इकॅम पुणे वार्ता हे बाळ मलाच वाढवायचे आहे, ह्याची संपूर्ण मानसिक तयारी करून मी कामाला लागलो होतो.


इकॅम- पुणे वार्ताचे उदघाटन - एक फसलेला कार्यक्रम  :

पहिल्या अंकाची तयारी जवळ जवळ पूर्ण झाली होती. या त्रैमासीकाचा रुक्षपणा घालवून त्या मनोरंजक अशा काही गोष्टींची पेरणी करणे आवश्यक होते. त्यासाठी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडुलकर यांची व्यंगचित्रे आपल्या त्रैमासिकात टाकावी असा मनात विचार आला. मग मी त्यांच्याकडे गेलो. पण जाताना वाटत होते एवढा मोठा माणूस आपल्याशी कशाला बोलेल? आपल्याला कशाला त्यांची व्यंगचित्रे देईल? दिलीच तर ते पैसे किती घेतील? मी तेंडुलकरांच्या घरी गेलो-त्यांनी माझे स्वागत केले. मी त्यांना माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले. ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला, ते मला म्हणाले या विजेच्या क्षेत्रात काम करत असताना त्रैमासिक काढायचे सुचले हेच मुळी आश्चर्यकारक आहे. हे काम सोपे नाही. या कामात तुम्हाला लागेल ती मदतकार्याला मी तयार आहे. त्यांनी मला त्यांच्या बेडरूम मध्ये नेले. एक भले मोठे कपाट उघडून दाखवले म्हणाले "ही माझी संपत्ती ! मी आतापर्यंत काढलेली व्यंगचित्रे ! घ्या हवी तेव्हडी.... मी त्यांच्या बोलण्यामुळे थक्क झालो. केव्हडे मोठे प्रोत्साहन... मंगेश तेंडुलकरांच्या स्वभावाचे अनेक पैलू त्यानंतरच्या काळात आमच्या झालेल्या मैत्री मुळे मला समजत गेले. मी मला आवडतील अशी १२ व्यंगचित्रे त्यांच्या कडून घेतली मानधनाबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी मानधन घेण्यास नकार दिला ते म्हणाले "तुम्ही एवढे मोठे काम करत आहात त्याबद्दल ही माझी सदिच्छा भेट समजा" मी उत्साहित आनंदीत होऊन तेथून बाहेर पडलो. (पुढे मंगेश तेंडुलकरांच्या कडे नेहमी जाणे त्यांच्याशी गप्पा मारणे हि माझी एक मानसिक गरज होऊन बसली, असो…)


पहिल्या अंकाची तयारी पूर्ण झाली. या त्रैमासिकाचे छानसे उदघाटन करावे असे ठरवले. दिवस ठरला २० फेब्रुवारी २०१०. मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण मंदिराचे जवळ जवळ ४०० प्रेक्षक बसतील एवढे प्रेक्षागृह. ४५० सभासदांना निमंत्रण पाठवले गेले. महावितरणचे संचालक श्री.झाल्टे, महावितरणचे मुख्य अभियंता अनेक अधिकारी यांना निमंत्रणे गेली. विद्युत निरीक्षक श्री. रणवरे त्यांचे सहकारी यांनाही आमंत्रित केले. उदघाटक प्रमुख पाहुणे म्हणून 'सकाळ 'या वृत्तपत्राचे तत्कालीन संपादक श्री. शरदचंद्रजी गोखले यांना बोलावले होते. याच कार्यक्रमात आम्ही तयार केलेल्या इकॅम पुणेच्या स्वतंत्र अशा वेबसाईटचे (www.ecampune.org ) उद्घाटनही करण्याचा घाट घातला होता. ही वेबसाईट तयार करण्यासाठी आमचे तरुण संचालक समीर देवधरांनी मोठा वाटा उचलला होता. भलामोठा बॅकड्रॉप तयार केला होता. आमंत्रितांसाठी प्रेक्षकांसाठी अल्पोपहाराचा चोख बंदोबस्त ठेवला होता. पहिल्या अंकासाठीचा खर्च उद्घाटनासाठीचा खर्च मिळून जवळ जवळ ६० ते ७० हजार रुपये एवढा घाट घातला. २० फेब्रुवारी २०१० हा दिवस उजाडला....


 कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना आठवणीसाठी फोन केले गेले. तयारी जय्यत झाली. कार्यक्रमाच्या बरोबर वेळेवर उद्घाटक वगैरे पाहुणे मंडळी आली. पण मला आमचे सभासद दिसेनात. मी काळजीत पडलो. सभागृहाच्या बाहेर येऊन, अगतिक होऊन, वेड्यासारखा सर्वांना फोन करू लागलो. पण असे किती फोन करणार? शेवटी निराश होऊन अर्धा तास उशिराने कार्यक्रमाला सुरवात केली... कार्यक्रम सुंदरच झाला पण प्रेक्षकांविना! एवढ्या मोठ्या प्रेक्षागृहात मोजून २५/३० सभासद हजर होते. उद्घाटक प्रमुख पाहुणे यांची भाषणे छानच झाली. माझा भाषणाचा उत्साह पार मावळला होता. पण नाईलाजाने, खोटा आव आणून रिकाम्या प्रेक्षागृहाकडे बघत कसेबसे भाषण संपवले. माझ्या आयुष्यातला हा पहिला (आणि हो... शेवटचाच )फज्जा उडालेला कार्यक्रम. यानंतर मात्र झालेल्या चुका टाळत पुढील सर्व कार्यक्रम यशस्वी केले. या ओसाड गावावर राज्य करताना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागणार होते देव जाणे ! इकॅम पुणे वार्ताची सुरवात अशी दणक्यात आपटत झाली.


इकॅम वार्ताचे झपाटून टाकणारे दिवस -:


पुढील काळात म्हणजे जवळ जवळ वर्षानंतर इकॅम पुणे वार्ता चे जाहिरातदार वाढले. इकॅम वार्ता रंगतदार होऊ लागला. आमच्याकडून प्रकाशनाला जर वेळ लागला तर काही सभासद अंक कधी येणार अशी विचारणा ही करू लागले. अशा वेळी बरे वाटे. सभासद अनेक विद्युत ठेकेदार अंक वाचत आहेत याची पावती त्या निमित्ताने मिळू लागली. भरपूर जाहिराती मिळू लागल्याने काही रक्कम इकॅम पुण्याच्या गंगाजळीत बाजूला पडू लागली. इकॅम पुण्यासाठी उत्पन्नाचा एक स्रोत या त्रैमासिक मुखपत्रामुळे निर्माण झाला. माझ्या कार्यकाळाच्या आधीच्या काळातील उत्पन्नाचे रेकॉर्ड मोडीत काढले गेले. अर्थात मला ही चढाओढ नको होती. मी मिळालेल्या रकमेत अनेक बहुपयोगी कार्यक्रम सभासदासांठी राबवले. मी मिळालेले पैसे साठवून ठेवले नाहीत. त्याचा इकॅमच्या कामात खर्च केला. इकॅम वार्ता करताना मला दुसरे काही सुचत नसे.

 सुरवातीला गरज म्हणून नंतर आवडीने इकॅम वार्तात लेख लिहू लागलो. मग काहीसा छंदच जडला लिहण्याचा! इतर विषयावरही लिहावेसे वाटून लिहू लागलो. मी प्रत्येक इकॅम वार्ताच्या सुरवातीला अध्यक्षीय लिहीत असे. या लेखात विद्युत ठेकेदारांचे प्रश्न चव्हाट्यावर आणू लागलो. सभासदांचे ठेकेदारांचे प्रबोधन करू लागलो. )कामगारांची सुरक्षा ) प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करायला हवे ) आम्ही प्रकाशाचे दूत ) भ्रष्टाचाराची लढाई स्थानिक पातळीवर कधी? ) कुणी मीटर देता का मीटर? ) S.O.P.च्या अंमलबजावणीचा अभाव, हेच भ्रष्टाचाराचे मूळ ) टेस्ट रिपोर्टचे महत्व ओळखा ) लेक टॅपिंग- कोयना प्रकल्पाचा टॉप गियर ) ऑल इज नॉट वेल १०) महावितरण घरचं झालं थोडं... ११) विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही१२) मित्रांनो... लिहिते व्हा, अश्या मथळ्याचे अनेक लेख मी त्या काळात लिहिले पैकी काही लेख वर्तमानपत्रातूनही छापून आले.