Tuesday, 10 May 2016

‘भारत’… खरच माझा देश आहे…?

‘भारत’… खरच माझा देश आहे?


" गेले आठ दिवस मी वीज बिलामध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी हेलपाटे मारतो आहे. तुमचे कर्मचारी मला या टेबलावरून त्या टेबलावर टोलोवतायेत. माझ्या वेळेला काही किंमत आहे कि नाही ? व्हॉट हेल इज गोइंग ऑन ?" एक वयोवृद्ध निवृत्त लष्करी अधिकारी महावितरण च्या एका कार्यालयात संतप्त होऊन जीवाच्या आकांताने ओरडून बोलत होते.  वेळ  होती सकाळी साडे अकरा वाजताची. संपूर्ण कार्यालयात मोजून तीन महिला कर्मचारी होत्या. आरामात कॉफी घेत गप्पा मारत बसलेल्या. कोणतेही वरिष्ठ अधिकारी नव्हते. सर्व अधिकारी मुख्य अभियंत्या बरोबर कसल्याश्या मिटिंग ला गेले होते म्हणे ! मी नवीन मीटर च्या कामासाठी या कार्यालयात आलो होतो. कार्यालयातील शुकशुकाट बघून मी ही थोडा वैतागलेलोच होतो.माझा हेलपाटा बहुदा वायाच जाणार होता. अधिकाऱ्यांची थोडी वाट बघावी या उद्देशाने थांबलो होतो.

या वयोवृद्ध ग्राहकाच्या तोफखान्यामुळे काहीश्या घाबरून गेलेल्या महिला कर्मचार्यांना काय बोलावे हे काळात नव्हते. त्या ह्या सद्गृहस्थांना शांत करायचा प्रयत्न करीत होत्या. तेव्हढ्यात या कार्यालयातील  एक कनिष्ठ अभियंता आले आणि ते आयतेच या चिडलेल्या ग्राहकाच्या कचाट्यात सापडले. बराच वेळ थांबलेले अजून दोन तीन ग्राहक तक्रारी करण्यास पुढे सरसावले. अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर या कनिष्ठ अभियंत्याने काही प्रमाणात या ग्राहकांच्या तक्रारी मार्गी लावल्या. तथापि तो वयोवृद्ध लष्करी अधिकारी शांत होत नव्हता. तो म्हणत होता " ज्या कर्मचार्यांनी मला तर दिला, त्यांना तुम्ही जाब कसा विचारणार? त्यांना काय शिक्षा करणार? ते मला तुम्ही आधी सांगा, त्याशिवाय मी येथून जाणार नाही."

खरे तर मी बराच वेळ या सर्व गोंधळाकडे स्थितःप्रज्ञा सारखे बघत होतो. माझा या घटनेशी काहीही संबंध नव्हता. महावितरण मधील हेलपाटे, तुच्छ वागणूक, बेफिकिरी, वगै. गोष्टी मला रोजच्याच ! पण मला त्या सद्ग्रहास्थांची चिडचिड, राग, घालमेल बघवेना. मी हि खूप अस्वस्थ झालो. मी पुढे झालो आणि त्या ग्राहस्थांची ओळख करून घेतली. 'रानडे' त्यांचे नाव ! ते एक निवृत्त वैमानिक होते. आयुष्यभर अतिशय शिस्तीत जगलेल्या ह्या या ग्राहस्थांची घालमेल मी समजू शकत होतोमाझ्या मनात विचार येत राहिले खरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या कडे कार्य तत्परता का असू नये ? व्यवस्थित पगार (वर भरपूर वरकमाई देखील) असून देखील कामे वेळेत का होत नाहीत ? सर्वच सरकारी कार्यालयात हा अनुभव येतो. आपल्या देशात एकीकडे प्रचंड बेरोजगारी आहे असे म्हणायचे तर दुसरीकडे नोकरी असूनही काम करण्याची मानसिकता असा प्रचंड विरोधाभास आहे. खरे तर कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता (Work Efficiency) वाढवण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. पण दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. तक्रार घेऊन गेल्यावर वरिष्ठ अधिकारी प्रश्न तात्पुरता सोडवतात. सर्वच एकमेकांना सांभाळून घेतात. खरे तर एखादी संस्था, कंपनी चालते ती जगन्नाथाच्या रथासारखी. प्रत्येकाचा हात या संस्थारूपी रथाला लागला पाहिजे. पण हा रथ कोण ओढतो आहे, हे कोणालाच माहिती नसल्यासारखे आपल्या सरकारी संस्था, कार्यालये चालतात. 'आजचे काम आजच, उद्या नाही' हे सूत्र पाळले गेले तर कोणतेच काम प्रलंबित राहणार नाही.

इकडे रानड्यांचे चिडून बोलणे चालूच होते  " एअरफोर्स मधील माझे आयुष्य खरेच छान होते. प्रत्येक गोष्ट आम्ही वेळेवर करण्याची शिस्त तिथे असते. तिथे चुकीला क्षमा ही नसते. शिस्त हि माझ्या जीवनाचा आता एक भागच झाली आहे. आता निवृत्ती नंतरही मी बेशिस्त वागू शकत नाही आणि इतरही कोणी तसे वागल्यास मी खपवून घेणार नाही. मला त्रास दिलेल्या कर्मचारी संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे." मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होतो. मग मी त्यांना बाहेर घेऊन गेलो एका उपहारगृहात आम्ही चहा घेतला. काही वेळाने थोडे शांत झालेले रानडे म्हणाले " जतकर, तुमच्याशी बोलल्यामुले मला आता खूप हलके वाटते आहे. आपल्याला भेटून खूप बरे वाटले. तुम्ही रोज महावितरण च्या कार्यालयातील कामे शांत डोक्याने कशी काय करता बुवा ? बर मला एक सांगा मी तक्रार केलेल्या कर्मचाऱ्यावर खरच काही कारवाई होईल का हो ?" मी निरुत्तर झालो

माझ्याशी गप्पा मारल्यावर काहीसे शांत झालेले रानडे म्हणाले " जतकर, मी कंटाळलोय या भारत देशाला. मला भारत हा देश माझा वाटतच नाहीये आताशा. मला माझ्या देशाबद्दल प्रेमच वाटेनासे झाले आहे. विचार करतो आहे कि कुठेतरी परदेशात जाऊन स्थाईक व्हावे झाले !" आता मात्र मी दचकलो. गंभीर झालो. थोडा निराशही झालो. मी त्यांना म्हणालो " रानडे साहेब तुम्ही तुमचा प्रश्न तुमच्यापुरता सोडवलात. पण आमच्या सारख्या सामान्य नागरिकांनी कुठे जायचे ? का सर्वानीच देश सोडून जायचे ? आपण आपल्या देशात राहूनच हि परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायला नको का?" पण रानडे मात्र त्यांच्या निराश अवस्थेतून बाहेर येत नव्हते.  

दिवसभर माझ्या डोक्यातून हा प्रसंग जात नव्हता. संध्याकाळी कामे आटोपून घरी जाताना नेहेमीप्रमाणे मी हृदयावर हात ठेवून मी " आल इज वेल " असे तीनदा म्हणायला विसरलो नाही. आज या घटनेला वर्षे उलटली.  माझी व्यावसाईक लढाई सुरूच आहे. आणि हो गंमत म्हणजे रानड्यांनी त्यावेळी तक्रार केलेल्या महावितरण च्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही 

राजीव जतकर
मोबाईल : ९८२२० ३३९७४.
इमेल : electroline4929@gmail.com


No comments:

Post a Comment