Monday, 20 May 2019

निवडणूक व्यवस्थेच्या विसंगतीवर भाष्य करणारा 'न्यूटन'


निवडणूक व्यवस्थेच्या विसंगतीवर भाष्य करणारा 'न्यूटन'

न्यूटन च्या प्रमुख भूमिकेतील राजकुमार राव
सध्या भारतात २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकांचा धुराळा उडतो आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशातील निवडणूका म्हणजे जगासाठी मोठ्या उत्सुकतेचा विषय असतो. आपण सामान्य नागरिक देखील या निवडणुकीत कमी अधिक प्रमाणात रस घेत असतो. आपल्याला प्रामुख्याने दिसतात त्या मोठ्या शहरातील मोठ्या नेत्यांच्या निवडणुका. ग्रामीण भागातील निवडणुका कशा होतात ते आपल्यापर्यन्त फारसे पोहोचतच नाही. भारतात निवडणूक घेताना निवडणूक आयोगापुढे आणि सरकारी यंत्रणेपुढे अनेक अडचणी येतात. गुंडगिरी, बूथ कॅप्चरिंग, हिंसाचार ह्या गोष्टी आता निवडणुकांचा जणू अविभाज्य भागच होऊन बसलेल्या आहेत. सीमाभागात निवडणूक घेतानाच्या अडचणी वेगळ्याच असतात. देशाच्या मध्यभागात विस्तारलेला माओवादी नक्षलवाद हा देखील देशाच्या अंतर्गत सुरक्षे साठी एक डोकेदुखीच आहे. ह्या नक्षली उग्रवाद्यांची पाळंमुळं आंध्रप्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, झारखंड, बिहार, महाराष्ट्र इत्यादी राज्यांच्या जंगली भागात खोलवर पसरलेली आहेत. काही शहरी बुद्धिजीवी मंडळी देखील या अशा चळवळींना खतपाणी घालताना दिसतात. महाराष्टाच्या शेजारचा छत्तीसगड या उग्रवादी लोकांच्या कारवायांचा एक प्रमुख अड्डा आहे. अशा डोंगराळ, अति दुर्गम आणि विरळ लोकवस्ती असलेल्या नक्षलग्रस्त भागात निवडणूक घेणे हे एक मोठे आव्हान असते.

भारतीय कायदे, कानून अशा आदिवासी लोकांना विकासाचे फायदे मिळण्यासाठी बनवले गेलेले आहेत. जंगलात खोलवर राहणाऱ्या आदिवासी लोकांना या निवडणुकांचा खरंच काही फायदा होतो का? दुर्दैवाने असे लोक विकासापासून वंचितच राहतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांना भारतीय व्यवस्थेतील अनेक गोष्टी खटकत असतात, पटत नसतात. प्रत्येकाला आपल्या देशाप्रती काहीतरी चांगले करायचे असते, पण आपण सर्वच जण प्रवाहाच्या रेट्यात अगतिकपणे वाहत जात असतो. पण असेही काहीजण असतात जे रोजच्या जगण्यात नियमाप्रमाणे वागत आपले कर्तव्य पूर्ण करत असतात. अशा कर्तव्यनिष्ठ लोकांना जगाशी काही घेणेदेणे नसते. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत असतात. ह्या अशा सर्व पार्श्वभूमीवर दिग्दर्शक 'अमित मसुरकर' हे आपल्या 'न्यूटन' नामक चित्रपटाद्वारे अतिशय परखडपणे व्यक्त होतात. भारतीय निवडणूक प्रक्रियेवर ते प्रश्नचिन्ह उभे करतात.
  
 
आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये चुकून एखाद्याने प्रामाणिकपणे वागायचं ठरवलं तर त्याला त्रासच होतो. या चित्रपटाचा नायक 'नूतन कुमार' (राजकुमार राव) हा त्यापकीच एक !  नूतन कुमार हा अतिशय प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ असा सरकारी अधिकारी असतो. स्वभावातील अतिप्रामाणिकतेमुळे तो थोडा हट्टी देखीलअसतो. त्याला स्वतःचे नूतन कुमार हे नाव आवडत नसल्याने त्याने स्वतःच्या नावातील 'नु' चे 'न्यू' आणि 'तन' चे 'टन' असा बदल करून 'न्यूटन' हे नाव धारण केलेले असते. त्याला जेंव्हा सरकारी नोकरी लागते तेव्हाच निवडणुका जाहीर होऊन छत्तीसगड मधील नक्षलग्रस्त दंडकारण्य च्या जंगली भागात निवडणूक अधिकारी म्हणून त्याची नेमणूक होते. न्यूटन चा भारतीय निवडणूक प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असतो. 'लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, त्यामुळे नक्षलग्रस्त भागातही मतदान झालेच पाहिजे' अशा विचाराने विचाराने झपाटून जाऊन तो कामाला लागतो. मात्र नक्षलग्रस्त भाग धोकादायक असल्याने घाबरटपणामुळे म्हणा किंवा नकारात्मक विचारांमुळे म्हणा न्यूटनला सर्वजण तिकडे जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या तत्वांना जीव की प्राण मानणाऱ्या न्यूटनवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तो हट्टाने या दूरवर असलेल्या जंगलातील भागात निवडणूक प्रक्रिया राबवायची ठरवतो आणि मग सुरु होतो माणसातल्या सकारात्मक आणि नकारात्मक वृत्तीमधील संघर्ष !
 
डावीकडून मेजर आत्मासिंग, मध्ये लोकनाथ आणि उजवीकडे न्यूटन 
  
या नक्षलग्रस्त जंगलातील सुरक्षा व्यवस्था आबादित ठेवण्यासाठी सैन्यदलातील 'मेजर आत्मासिंग' (पंकज त्रिपाठी) याची नेमणूक झालेली असते. निवडणुकीवर नक्षलवाद्यांनी घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर न्यूटन आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मेजर आत्मासिंग आणि त्याच्या सहकारी सैनिकांवर असते. सर्वांना 'इथं मतदान होणारच नाही' असं वाटत असतं. पण न्यूटनला मात्र 'इथं मतदान होईल आणि ते निष्पक्षपणे व्हायलाच हवं' असं वाटत असतं. या भागातली सुरक्षेची घडी बिघडू नये म्हणून मेजर आत्मासिंग न्यूटन समोर नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचा बागुलबुवा उभा करून न्यूटन आणि सहकाऱ्यांनी आल्या पावली परत जावे म्हणून प्रयत्न करत असतो. पण न्यूटनच्या हट्टापुढे त्याला नमते घ्यावे लागते. मग सुरु होते प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया...


मेजर आत्मासिंग (पंकज त्रिपाठी) 
मेजर आत्मासिंगच्या कडेकोट सुरक्षेत पाचसात किलोमीटर घनदाट जंगल तुडवत न्यूटन आणि त्याचे सहकारी आदिवासी गावात पोहोचतात. नक्षलवाद्यांनी जाळलेल्या एका पडक्या घरात ही मंडळी थोडी स्वच्छता करून, बूथ आणि टेबलखुर्च्या मांडून तयारी करतात. निवडणुकीची वेळ सुरु होते. पण बराच वेळ न्यूटन च्या या निवडणूक केंद्रावर कुणीच फिरकत नाही. न्यूटन निराश होतो. शेवटी मेजर आत्मासिंग त्याचे सहकारी सैनिक आजूबाजूच्या वस्तीवरून माणसे गोळा करून आणतात. न्यूटनला हे पटत नाही. मतदानाला सुरवात होते. ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करायचे याची देखील माहिती नसणारे हे आदिवासी मतदार बघून न्यूटन थक्क होतो. मग मतदान कसे करायचे याची माहिती द्यायला न्यूटन सुरवात करतो. न्यूटनच्या या हट्टापुढे आत्मासिंग वैतागतो. याच सुमारास विदेशी पत्रकार, मीडिया तिथे पोहोचतात. मीडिया आणि पत्रकार निघून गेल्यावर अचानक फायरींग चा आवाज होतो. धावपळ होते. नाईलाजाने सर्वजण निवडणूक अर्धवट गुंडाळून परतीच्या मार्गावर निघतात. ठरवून केलेल्या या गोष्टी न्यूटनच्या हळू हळू लक्षात येऊ लागतात. न्यूटन देखील हट्टाला पेटतो. मग पुढे न्यूटन च्या अपेक्षेप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होते का हे चित्रपट पाहूनच समजून घेणे मजेशीर ठरेल. 

लोकनाथ (रघुवीर यादव), 
समाजातील सकारात्मकता आणि नकारात्मकता या वृत्तीचा संघर्ष या चित्रपटात अतिशय वेधक पद्धतीने मांडण्यात आलेला आहे. या दोन्ही टोकाच्या भूमिका घेणाऱ्या न्यूटन आणि मेजर आत्मासिंग यांच्या संघर्षात थोडा सुवर्णमध्य साधणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य वर्गाचे प्रतिनिधित्व न्यूटन चे सहकारी करतात. न्यूटनचे सहकारी लोकनाथ (रघुवीर यादव), शंभुनाथ (मुकेश प्रजापती), आणि या नक्षलग्रस्त भागातली स्थानिक रहिवासी तरुणी माल्को  (अंजली पाटील) अतिशय प्रभावीपणे आणि मिश्किलपने आपापल्या भूमिका सकरतना दिसतात. त्यातही अतिशय अनुभवी आणि कसलेले अभिनेते रघुवीर यादव विशेष लक्षात रहातात. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या सावटाखाली काम करताना गमतीजामती करत ताण हलका करणारा लोकनाथ त्यांनी मस्तच रंगवला आहे. नक्षलवाद्यांचे वास्तव आणि त्यांच्याबद्दलचा सरकारी विपर्यास या दोन्हीही बाजूंची जाण असलेल्या माल्को च्या भूमिकेत असलेल्या अंजलि पाटिल या अभिनेत्रिने अतिशय संयमित अभिनय केलाय. नक्षलवाद्यांच्या भीतीच्या सावटखाली जगणाऱ्या स्थानिक आदिवासींची नेमकी ओढाताण ती सातत्याने न्यूटनला समजावून सांगते. मोठ्या आणि दमदार सहकलाकारांमध्ये ती आपली छाप सोडून जाते. वेगळ्या प्रकारच्या अनेक चित्रपटातून दिसणारा पंकज त्रिपाठी हा कसलेला अभिनेता मला नेहेमीच आवडत आलाय. आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण भूमिकेत चमकलेला पंकज त्रिपाठी मेजर आत्मासिंगच्या भूमिकेचे अक्षरशः सोने करतो.

माल्को  (अंजली पाटील)
न्यूटन च्या प्रमुख भूमिकेतील राजकुमार राव या अभिनेत्याबद्दल लिहावे तितके थोडेच आहे. खरं तर त्याचा 'ट्रॅपड' हा एकमेव चित्रपट मी पाहिलेला आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'न्यूटन' ह्या चित्रपटासाठी राजकुमार राव याला उत्तम अभिनयासाठी 'एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड' मिळाले असून 'फिल्म फेअर क्रिटिक्स अवॉर्ड' देखील देऊन त्याला गौरवण्यात आले आहे. न्यूटन च्या व्यक्तिरेखेत राजकुमार राव अगदी मिसळून गेला आहे. या भूमिकेतील न्यूटनची नोकरीप्रती असणारी कर्तव्यनिष्ठता, इमानदारी त्याच्या सहज अभिनयातून उभी राहते. कमी बोलूनही केवळ डोळ्यातून भाव व्यक्त करणे हे ह्या गुणी अभिनेत्याचे वैशिष्ट्य आहे. राजकुमार राव चा अभिनय या चित्रपटाचा प्राण आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील राजकुमार राव हा एक 'लंबी रेस का घोडा' आहे, असेच म्हणावे लागेल
  
आदिवासी मतदार 
या चित्रपटातील काही संवाद प्रेक्षकांना अंतर्मुख करतात. चित्रपटातील रघुवीर यादव यांच्या आवाजातील शेवटचे 'दिल बोला तू अपना काम कर' हे गाणे अतिशय अर्थपूर्ण आहे. दुर्दैवाने ते शेवटच्या श्रेयनामावलीच्या वेळी असल्याने 'घरी जायची घाई' असलेल्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहचत नसावे. अतिशय नकारात्मक वातावरणात वावरणारा आपल्यासारखा सामान्य प्रेक्षक चित्रपट संपल्यावर एक आशावाद घेऊनच चित्रपटगृहाबाहेर पडतो. निवडणुकांसारख्या गंभीर सामाजिक विषयावर उत्तम कास्टिंग असलेला हा चित्रपट निवडणूक व्यवस्थेच्या विसंगतीवर नेमके भाष्य करतो आणि आपल्याला अंतर्मुख करून जातो.

टीप: ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ वर हा चित्रपट उपलब्ध आहे. ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघाच !

राजीव जतकर.